सहा फूट उंच. पांढरी शुभ्र दाढी. अंगावर चढवलेली पठाणी. डोळ्यात सुरम्याच्या सांज कडा आणि श्वासातून दरवळणारे जादूई अत्तर. एखाद्या हिरो सारखे दिसायचे उस्मान अंकल.
उस्मान अंकल म्हणजे जुन्या चित्रपटांचे चालते बोलते विद्यापीठचं. सत्तर ऐंशीच्या काळातले कोणतेही गाणे उस्मान अंकलला विचारावे आणि त्यांना त्या गाण्याचा गीतकार - संगीतकार - गायक माहीत नसावा हे शक्य नाही. माहीम मध्ये अंकलचे छोटेखानी हॉटेल होते लजीज नावाचे. अंकलच्या बोलण्यात कळले होते की, ९० च्या काळात अंकलने ते विकून टाकले होते. पण हॉटेल मध्ये सतत सुरू असणकऱ्या रेडिओने अंकलने जोपासलेला हा आगळा वेगळा चित्रपट गाण्यांचा छंद कमालीचा होता. उस्मान अंकल मला लाडाने छोटे म्हणायचे.
हीना आंटी. उस्मान अंकलची बायको. साठ वैगरे वय असेल हीना आंटीचे. दोन्ही किडन्या फेल झाल्याने हीना आंटी दरवेळी डायलिसिस साठी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असायची. हॉस्पिटलचे जेवण आली की हीना आंटी नेहमी बोलायची, "आ गयी मुसीबत. ना नमक है, ना मिर्च ना कुछ सिर्फ उबलके देते है". उस्मान अंकल चेष्टेत म्हणायचे, "अरे तू हॉस्पिटलमें है हॉटेल में नही जो तुझे डाल घोश मिलेगा". हीना आंटी नकोच म्हणायची. मग उस्मान अंकल एखाद्या लहान लेकरासारखी तिची समजूत काढायचे, "घोश समझकर खा देख टेस्टी लगेगा." आंटी ही आपली पर्याय नसल्याने नाक तोंड मुरडत आपली मुकाट्याने खायची.
'घोश समझकर खा टेस्टी लगेगा' उस्मान अंकलच्या यावाक्यात त्यांच्या हॉटेल व्यवसायाचा अनुभवत जाणवायचा. उस्मान अंकलने कष्ट करून दोन मुली आणि एक मुलगा उच्चशिक्षित केले होते. खरतरं अंकल म्हणायचे, "परिंदे को पंख दिये जाते है उसे उडणा नही सिखाते". त्यांचा मुलगा बँगलोरला नोकरी करत होता. आणि मुली लग्न करून आपल्या घरी सुखात होत्या. पण या साऱ्या संसाराच्या जंजाळात आपल्या बायकोकडे आपल्याला जास्त लक्ष देता आले नाही या विचाराने अंकल अस्वस्थ व्हायचे.
खरतरं हीना आंटीची किडनी ट्रान्सप्लांटही शक्य नव्हती. त्यामुळे ती जेवढी डायलिसिस वर जगेल तितकेच तिचे आयुष्य होते.
एक दिवस डायलिसिस करताना हीना आंटी सिरीयस झाली. तिला इमर्जन्सी ICU मध्ये शिफ्ट केले. उस्मान अंकल सैरभैर झाले होते. मुलाला आणि मुलीला फोन करून बोलावले. घाई घाईत सगळं सामान ICU मध्ये घेऊन जाताना मला इतकेचं म्हणाले, "हीना सिरीयस हो गयी है. ICU में शिफ्ट किया डायलिसिससे. आंटी के लिए दुवा कर छोटे". अंकलचे शब्द ऐकून माझे हात पाय थंड पडले. पण मी उठून अंकलला आधार ही देऊ शकत नव्हतो. त्या सगळ्या गडबडीत उस्मान अंकलचे पाकीट कुठेतरी पडले. रात्री उशिरा उस्मान अंकल पुन्हा जनरल वॉर्डमध्ये येऊन शोधू लागले तेव्हा कळले.
त्यादिवशीची उस्मान अंकलची बैचेनी पहावत नव्हती. मी विचारताच अंकल म्हणाले, "मेरा बटवा कही गिर गया है." मी, "कितने थे पैसे". "पैसे छोड दे मेरे ब्लड प्रेशरकी गोली रखता था में उसमें". ऐकून वॉर्ड मधले बाकीच्या पेशंटचे नातेवाईकही उस्मान अंकलचा बटवा शोधू लागले पण सापडला नाही. अंकलला विचारले, "क्या नाम है गोली का?". उस्मान अंकलला त्यागोळीचे नाव माहीत नव्हते. त्यांना म्हणाला, "बच्चे को फोन करके पुछ लो अंकल. डरो मत". त्यांनी मुलाला फोन लावून माझ्याकडे दिला. अंकलचे हात थरथर कापत होते. मी फोनवर बोलता अंकलच्या मुलाने गोळीचे नाव SMS केले. अंकलला बोललो, "मै कुछ करता हूँ. मंगवाता हू गोली." लगेच वडिलांना फोन केला पण ते जस्ट घरून निघाले होते हॉस्पिटलला यायला. म्हणजे त्यांना पोहचायला तरी दीड दोन तास लागणा हे नक्की होते. आणि प्रिस्क्रिप्शन नाही तर तेही काही करू शकणार नव्हते. काय करावे सुचत नव्हते. अंकलला बोललो, "आप जाओ नीचे ICU आंटी के पास. गोली आयेगी तो मैं फोन करुंगा आपको". अंकल लगेच निघून गेले.
काहीच कळायला मार्ग नव्हता. अंकलचे थरथरते हात आठवते होते. आणि कसलाच विचार न करता मित्र संदीपला फोन लावला. तो कुर्ल्याच्या जवळपास कुठेतरी होता. त्याला घडलेले सगळे एक दमात सांगितले. त्यालाही काय करावे कळेना. संदीप एकच वाक्य म्हणाला, "मी करतो काहीतरी जुगाड आणि येतो हॉस्पिटलला गोळी घेऊन". आणि एक तासाने संदीपचा फोन आला, "हॅलो ! हॉस्पिटलच्या खाली उभा आहे रे." संदीप अंकलची गोळी घेऊन आला होता. कशी आणि कुठून हे संदीपने कधी सांगितले नाही. आज संदीप असता तर हे वाचून हसला असता. पण उस्मान अंकलच्या ब्लड प्रेशरच्या गोळीसाठी त्याने जुगाड केला खरा, पण आज पासून सहा वर्षापूर्वीचं संदीप हार्ट अटॅकने गेला. कायमचा. बायको - दोन लेकरं आणि सगळं सगळं मागे सोडून.
उस्मान अंकलला फोन करून बोलावले. त्यांना गोळी दिली आणि लगेच खा म्हणालो. पण उस्मान अंकलने काही खाल्ले नव्हते म्हणून एक मारी बिस्कीट ऑर्डर करून मागवले आणि मग बिस्कीट खाऊन उस्मान अंकलने ब्लड प्रेशरची गोळी घेतली. त्याक्षणाचे समाधान मोठे होते. तो क्षण आजही आठवतो आणि संदीपही. दुसऱ्या दिवशी दुपारी उस्मान अंकलचा बटवा हॉस्पिटलच्या फाईल ठेवलेल्या पिशवीत सापडला.
उस्मान अंकलचा मुलगा फ्लाईटने पहाटेच मुंबईत उतरला होता. एअर पोर्ट वरून त्याने डायरेक्ट हॉस्पिटल गाठले. हीना आंटीला भेटला आणि लगेच मला भेटायला आला. माझ्या बेडजवळ येताच,"भाई thank you so much. कल डॅडी को गोली लाकर देने के लिए". आणि बोलता बोलता त्याने खिशातून पैसे काढून देऊ लागला. "बस क्या ! भाई बोलता है और पैसा देता है". माझे शब्द ऐकून त्याला भरून आले. मी सांगितले त्याला की मित्राने औषध आणले. तो म्हणाला, "वो आयेंगे तो मुझे फोन करना. आउंगा उन्हे मिलने".
हीना आंटी आता स्टेबल झाली होती. तीन दिवस ICU मध्ये राहिल्यावर तिला आता जनरल वॉर्डला शिफ्ट केले होते. त्या तीन दिवसात ICU मध्ये शक्य नव्हते तर उस्मान अंकल माझ्या बेडजवळ येऊन नमाज वाचायचे. मी खूप जवळून पाहिलं आहे उस्मान अंकलला अल्ला सोबत बोलताना. पुढे दोन दिवसाने हीना आंटीला डिस्चार्ज दिला. जाताना उस्मान अंकल आणि त्यांच्या मुलाच्या डोळ्यात पाणी आले. माझ्या हातात हात देत उस्मान अंकल म्हणाले, "चलता हूँ छोटे." मी माझा आवडता डायलॉग म्हणालो, "बस दुवा में याद रखना अंकल". दाटलेल्या स्वरात अंकल बोलले, "ये भी कोई बोलने वाली बात है".
सात वर्ष झाले या साऱ्या घटनेला. हीना आंटी घरी गेल्या नंतर उस्मान अंकलच्या मुलासोबत पुढे सहा महिने बोलणेही झाले फोनवर अनेकवेळा. नंतर त्याचा मोबाईल नॉट रीचेबल झाला. कदाचित तो आऊट ऑफ इंडिया गेला असेल नोकरीसाठी. नाहीतरी उस्मान अंकल बोलायचेच, "परिंदे को पंख दिये जाते है. उसे उडना नही सिखाते".
खरतरं हीना आंटी आता असेल का?. उस्मान अंकल कसे असतील?. त्यांना गोळी घेताना संदीपची आठवण आजही येत असेल का? असे अनेक प्रश्न डोक्यात येत राहतात. अत्तरचा जेव्हा जेव्हा कुठे सुगंध येतो मला उस्मान अंकल आठवतात.
मनात उगाच वाटतं राहते. उस्मान अंकलचा मुलगा कधीतरी भेटेल. काही नाही मला फक्त त्याला एकच सांगायचे आहे की, "संदीप थेट अल्लाकडे गेला आहे उस्मान अंकलसाठी दुवा मागायला."
उस्मान अंकलच्या हृदयाला जपलेला संदीप, स्वतःच्या हृदयाला जपू शकला नाही. २८-२९ हे काही वय नसते हार्ट अटॅकने जायचे. तरी संदीप न सांगता गेला होता. त्याच्या सोबतच्या अनेक आठवणी आजही मनात लख्ख आहेत.
संदीप गेला त्यावर्षी ईदला दोन ओळी लिहिल्या होत्या,
"मेरा यार मिले मुझे
बस वही मेरी ईद है !"
पण एक गोष्ट खरी आहे त्यारात्री उस्मान अंकलच्या हृदयावर संदीपने त्याचे नाव लिहिले. कायमचे.
आपल्या आयुष्यात असे अनेक उस्मान अंकल येतात. आणि आपल्याला त्यांचा संदीप होण्यासाठी आधी एक निस्वार्थी माणूस व्हावे लागेल.
संदीप गेल्या नंतर दोन वर्षाने आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या व्यक्तींच्या बायपास सर्जरीसाठी मदत गोळा करण्याचा प्रयत्न करू लागलो. संदीपने जात जाता मनात पेटवलेल्या ह्या माणूसकीच्या ठिणगीने आज पर्यंत आठ रुग्णांसाठी बायपास सर्जरीचा खर्च जमा करून मदत करु शकलो, हिच संदीपला. त्याच्यातल्या माणसाला. आणि दोस्ताला आदरांजली.
.......मिस यू रे संदीप दोस्ता मिस यू !
- राहुल सिद्धार्थ साळवे
वाशी, नवी मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा